राजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. 'छावा'च्या जोरदार स्वागतानं तर हे सिद्ध झालं आहे.
एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंदर! मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वासघातक्यांची!
रणांगणाचा सत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येतांना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि 'बुधभूषणम' काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा हे पाहिले की प्रतिभा देवदत्त असली तरी एक अजब व विस्मयकारी देणगी आहे असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यायले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते, हे छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा